● वणीच्या मोमिनपुरा येथे गोवंश कत्तलीचा पर्दाफाश! ७० किलो मांस जप्त, दोघांना अटक

1042

वणीच्या मोमिनपुरा येथे गोवंश कत्तलीचा पर्दाफाश! ७० किलो मांस जप्त, दोघांना अटक


वणी (जि.यवतमाळ) । १५ डिसेंबर, २०२५ :

वणी शहरातील मोमीनपुरा भागात अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्रीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी केलेल्या धाडसत्रात ७० ते ८० किलो गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून कत्तलीसाठी वापरले जाणारे अवजारे आणि यंत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई शहरातील धार्मिक भावनांचा आदर राखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

▪︎गोपनीय माहितीवरून पोलिसांची त्वरित कारवाई

वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाल उंबरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश अपसुंदे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले. रविवारी सकाळी अकरा वाजता मोमिनपुरा परिसरातील हमीद चौक जवळील एका घरावर छापा टाकण्यात आला. तपासात घरातून मोठ्या प्रमाणात ताजे गोमांस सापडले, ज्याची बाजारभावानुसार किंमत १६ हजार रुपये आहे. याशिवाय चार धारदार लोखंडी चाकू, वजनकाटे, प्लास्टिक पिशव्या आणि जुनी इलेक्ट्रिक मीट मिन्सिंग मशिनही जप्त करण्यात आली. एकूण जप्त मालाची किंमत सुमारे ३३ हजार रुपये असल्याचा अंदाज आहे.

अटकेतील संशयित म्हणजे मोहम्मद एजाज अब्दुल अजीज कुरेशी (वय ५७) आणि मोहम्मद कैसर मोहम्मद अजीज कुरेशी (वय ४२), दोन्ही मोमिनपुरा परिसरातील रहिवासी.

त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम ५, ९ आणि भारतीय न्याय संहितेच्या ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कनाले यांनी मांसाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी घेतले असून, नाशवंत मांस नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात येणार आहे.

▪︎शहरात संताप; पोलिसांची कडक भूमिका

ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरातील विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गोवंश कत्तल हा केवळ कायद्याचा भंग नव्हे, तर धार्मिक भावना दुखावणारा गुन्हा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

पोलीस निरीक्षक उंबारकर यांनी सांगितले, “अशा अवैध क्रियाकलापांवर आमची करडी नजर आहे. कोणत्याही प्रकारची माफी नसून, भविष्यातही अशा कारवाया सुरू राहतील.”

तपास पुढे फौजदार विशाल राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. वणीकरांमध्ये या कारवाईचे स्वागत होत असले तरी, शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही घटना धोक्याची घंटा मानली जात आहे.


www.WaniSamachar.com